Tuesday, April 28, 2020

रागचक्र

रागचक्र 
या कवितेतून मी शास्त्रीय संगीतातील विविध रागांच्या संगतीने दिवस कसा घालवावा, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रत्येक रागाचे नाव हे दिवसातील त्या रागाच्या वेळीच गुंफण्याचा प्रयत्न केला आहे.
पण काही ठिकाणी काव्यवृत्तात बसवण्यासाठी रागवेळेबद्दल थोडी मुभा घेतली आहे.
जाणकारांनी ती माफ करावी.


भैरवाच्या भक्तिभावे आसमंता जाग यावी,
तोडी अन् आसावरी वैराग्यभावे आळवावी.


सूर्यबिंब उदयास यावे घेउन ललित स्वरावली,
सचैल मग ते स्नान व्हावे गात राम अन् गुणकली.


देसकारे गात घ्यावा न्याहारीस उपमाच तो,
कान माझे तृप्त व्हावे ऐकुनी हिंडोल तो.


काम करण्या मग निघावे ऐकुनी रे शंकरा,
वाजवूनी राग देसी रागिण्या याव्या घरा. 


तप्त त्या दूपारसमयी आसनी मग बैसुनी,
भोजनी या ऐकु यावा सारंग तो वृंदावनी.


ताक पिउनी एक मग तो मस्त द्यावा ढेकर,
भूप राग ऐकीत यावी वामकुक्षी लवकर.


तासाभराने जाग यावी ऐकुनी केदार तो,
हमीर रागे रंग यावा कशायपेयपानास तो.


सांजेस त्या सुरुवात व्हावी शुद्ध कल्याण श्रवूनी,
ॠषभ कोमल मारव्याचा हुरहूर आणी मनी.


संधिकाल होऊन गेल्यावरी वाजवुन बासरी,
श्यामकल्याणास गाऊन व्हावी राधा बावरी.


अवीट यमनाच्या स्वरांचे मज अंगणी चांदणे,
शिंपडावे हेच त्या स्वरचंद्रास आहे मागणे.


धूप नंदादीप लावावा आता देवालयी, 
बिहागरागाच्या स्वरांची दीप्त पणती मृण्मयी. 


भोजनी मग ऐकु यावा धुंद स्वर बागेश्रीचा, 
पान खातानाच यावा सूर तो पटमंजिरीचा.


सूर चंद्र-मधुकंसीचे ते रात्रीला दरबारी यावे,
कुरुवाळुन हंसध्वनीने नयनपटल मग बंद व्हावे.


-- सौरभ जोशी

Tuesday, March 31, 2020

सद्गुरु माउली श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या जन्मदिनानिमित्त


त्रैलोक्याधिपती, त्रिगुणात्मक, कृपासिंधु, करुणासागर, भक्तवत्सल, दीनानाथ, परमसमर्थ, सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्मदिन सद्गुरु माउली श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी हे काव्यपुष्प अर्पण.

कृपासिंधु नरसिंह सरस्वती जगद्गुरु माउली,
अखिल जगावर दीनानाथा, धर मायेची साउली.

एकटाच मी होतो जेव्हा अबोल होत्या दिशा,
पदाम्बुजी तव घेउनि मजला दाखविलीस सोन उषा.

गिरिवनाच्या भूमीवरती उभविलेस नंदनवन,
निमित्त मजला केलेस त्याते, भरून आले माझे मन.

ध्यानमंदिरी तव इथल्या जमले आज सारे भक्त जन,  
दिव्यानंदे ओले होती आज पहा मम नयन.

शिम्पवतोस धन संस्कारांचे बालमनांच्या पटलांवरती,
अशीच व्हावी अविरत सेवा, इच्छा मम तव चरणापुढती

सत्कार्यांच्या तटानमधुनी वाहविलीस मम सरिता,
आज तुझ्या या जन्मदिनी कृतकृत्य जाहलो आता.

तवप्रसादे सफल होवो भक्तजनांच्या मनोकामना,
गुणगान गावे तुझे कितीही, मम समाधान होईना.

तुझ्या कृपेचा वज्रलेप हा भक्तांवर राहू दे,
आनंदाची उष:प्रभा उगवून सदा राहू दे.

-- सौरभ . जोशी.

पहिला पाऊस

पहिला पाऊस

लखलख आभाळात,
बसे लपून चांदवा l  
पहिल्याच पावसाचा,
भिडे अंगाला गारवा. ll

वैशाखात भाजलेल्या,
साऱ्या आसमंतावरी l 
शिंपी नाजूक ओलावा,
अन चैतन्याच्या सारी. ll 

धडधडा गडगडा ,
वाजे आभाळी नगर l 
मायधरेच्या अंगणी,
 फुले मोराचा पिसारा. ll 

नेई मृदगंध वाहून,
कसा भणाणता वारा l 
मोदेभरल्या थेंबांत,
अन अंगावरी शहारा. ll 

नभातून धरेकडे,
लागे मोत्यांची पंगत l 
दऱ्या डोंगरामधुनी,
पाणी दिसले रंगात. ll 

काळ्या उजाड मातीला,
आता पाजले अमृत l 
उमलेल गर्भातून तिच्या,
हिरवी पालवी डोलत. ll 

-- सौरभ जोशी 

दशप्राणांची ज्योत निमाली

सियाचेनमध्ये आपले देशसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत असताना झालेल्या नैसर्गिक अपघातात स्वप्राणांची आहुती देणार्या त्या दहा सैनिकांना माझी काव्यरूप श्रद्धांजली...!!

सियाचेनच्या दुर्गम भूमी
दहा व्यग्र ते सैनिक कामी.


किती ओझे ते पाठीवरती,
वजनदार ती बंदूक हाती.


उंच हिमाच्या शिखरांवरती,
करडे डोळे गस्त घालती.


करुनि छातीचा अभेद्य कोट
रक्षित होते मायभूमीतट.


तापमान ते किती विचारा,
शून्याखाली सदैव पारा.


काय अन्न अन् काय निवारा,
शरीरावर बर्फाचा मारा.


कशाचीच ना करता पर्वा,
देश रक्षणे अखंड सेवा.


अन् अचानक घात जाहला,
बर्फाचा तट निखळुन आला.


वेग तयाचा किती भयंकर,
क्षणात कापीत आला अंतर.


त्याच्या वाटे जे जे आले,
निर्दयतेने त्याने गिळले.


परी कर्तव्याला जागत होते,
भारतभूचे दहा पुत्र ते.


मुळीच ना रे ते डगमगले,
झुंज तटाशी देते झाले.


लढवय्यांचे वज्रदेह ते,
अडकून गेले बर्फतटांते.


साद तयांची ऐकायाला,
कुणीच नव्हते त्या वेळेला.


असहाय होऊनी दहा जीव ते,
क्षणाक्षणाला गोठत होते.


रक्ताचे ना ओघळ दिसले,
रक्त शरीरी गोठून गेले.


अखेर मग दुर्दैवी झाली,
दशप्राणांची ज्योत निमाली.


वैश्वानर तो शौर्याचा,
वैश्वानर तो धैर्याचा,

वैश्वानर तो त्यागाचा,
चटका लावून हृदयाला,

हिमउदरी बघ शांत जाहला,
हिमउदरी बघ शांत जाहला.

-- सौरभ जोशी

सरता ज्येष्ठ महिना

सरता ज्येष्ठ महिना

सरता ज्येष्ठ महिना..

परत वर्षा ऋतु..

परत मृद्गंध..

परत तेच भीमसेनजी..

परत तोच मियाँ मल्हार..

परत तेच करीम नाम तेरो..

तोच आवाज..

तोच गळा..

तेच शब्द..

तेच स्वर,

तोच नाद..

तोच राग..

तेच आरोह..

तेच अवरोह..

तोच दम..

तोच ताल..

तीच सम..

तोच काल..

तीच टाळी..

तेच खंड..

तेच आवर्तन..

पण..पण..पण..

नवीन रंग..

नवीन गंध..

नवीन तेज..

नवीन चैतन्य..

नवीन स्वप्नं..

नवीन श्वास..

नवीन ध्यास..

नवीन पालवी..

नवीन सळसळाट..

नवीन मेघ..

नवीन थेंब...

नवीन आंदोलनं..

नवीन झुळुका..

नवीन वारे..

नवीन धुंदी..

नवीन दाद..

नवीन अनुभूती..

...आणि अलौकिक चिदानंद..आत्मानंद...


-- सौरभ जोशी