Tuesday, March 31, 2020

दशप्राणांची ज्योत निमाली

सियाचेनमध्ये आपले देशसेवेचे कर्तव्य चोखपणे बजावत असताना झालेल्या नैसर्गिक अपघातात स्वप्राणांची आहुती देणार्या त्या दहा सैनिकांना माझी काव्यरूप श्रद्धांजली...!!

सियाचेनच्या दुर्गम भूमी
दहा व्यग्र ते सैनिक कामी.


किती ओझे ते पाठीवरती,
वजनदार ती बंदूक हाती.


उंच हिमाच्या शिखरांवरती,
करडे डोळे गस्त घालती.


करुनि छातीचा अभेद्य कोट
रक्षित होते मायभूमीतट.


तापमान ते किती विचारा,
शून्याखाली सदैव पारा.


काय अन्न अन् काय निवारा,
शरीरावर बर्फाचा मारा.


कशाचीच ना करता पर्वा,
देश रक्षणे अखंड सेवा.


अन् अचानक घात जाहला,
बर्फाचा तट निखळुन आला.


वेग तयाचा किती भयंकर,
क्षणात कापीत आला अंतर.


त्याच्या वाटे जे जे आले,
निर्दयतेने त्याने गिळले.


परी कर्तव्याला जागत होते,
भारतभूचे दहा पुत्र ते.


मुळीच ना रे ते डगमगले,
झुंज तटाशी देते झाले.


लढवय्यांचे वज्रदेह ते,
अडकून गेले बर्फतटांते.


साद तयांची ऐकायाला,
कुणीच नव्हते त्या वेळेला.


असहाय होऊनी दहा जीव ते,
क्षणाक्षणाला गोठत होते.


रक्ताचे ना ओघळ दिसले,
रक्त शरीरी गोठून गेले.


अखेर मग दुर्दैवी झाली,
दशप्राणांची ज्योत निमाली.


वैश्वानर तो शौर्याचा,
वैश्वानर तो धैर्याचा,

वैश्वानर तो त्यागाचा,
चटका लावून हृदयाला,

हिमउदरी बघ शांत जाहला,
हिमउदरी बघ शांत जाहला.

-- सौरभ जोशी

No comments:

Post a Comment