स्वातंत्र्यदिनानिमित्त पडलेले काही अनुत्तरीत प्रश्न
(ही कविता काही वर्षांपूर्वी केली असल्याने त्यात काही तात्कालिक संदर्भ आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.)
चौसष्ट वर्षांपूर्वी
स्वातंत्र्याची पहाट उगवली,
दीडशे वर्षांच्या गुलामीतून
भारताची सुटका झाली.
पण,
मायभूमीचे सोनेरी वैभव परत आपल्याला मिळेल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?
फाळणी झाली, युद्धे झाली,
दंगे झाले, बॉंबस्फोट झाले,
तंत्रज्ञानाच्या शक्तीने
भारतीय यान चंद्रावर गेले.
पण,
कर्जबाजारी शेतक-याला प्राणज्योत दिसेल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?
दिल्लीतील राजपथावर
संचलने होतील,
राजकीय नेते ती
काचेतून पाहतील.
पण,
भ्रष्टाचाराच्या गर्तेतून भारत बाहेर येईल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही
सार्वजनिक सुट्टी येईल,
आणि मॉल्समधील थिएटर्स,
तुडुंब भरून जातील.
पण,
टिळक, नेताजींच्या त्यागाची आठवण तरी होईल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?
शाळा-महाविद्यालयांमध्ये
ध्वजारोहणाचे सोहळे होतील,
वंदे मातरम् आणि राष्ट्रगीताच्या
मोठ्या गर्जना होतील.
पण,
सवरकरांची राष्ट्रनिष्ठा कधी आपल्यात रुजेल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?
अहिंसा आणि सत्याग्रहांची
पुन्हा एकदा उजळणी होईल,
फडकणा-या तिरंग्याबरोबर
महात्म्यांनाही सलाम होईल.
पण,
भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंचे स्मरण तरी होईल का ?
वर्ल्डकप जिंकल्यावर झालेला जल्लोष स्वातंत्र्यदिनी होईल का ?
- सौरभ जोशी
No comments:
Post a Comment